राज ठाकरे यांनी संयुक्त मुलाखतीत अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक स्पष्ट करत मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. मुंबई, विमानतळ आणि उद्योगपतींच्या संबंधांवर थेट भाष्य.

मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
मुंबईच्या भविष्यावर बोलताना राज ठाकरे यांनी देशातील दोन मोठे उद्योगपती – गौतम अदानी आणि मुकेश अंबानी – यांच्यातील मूलभूत फरक अधोरेखित केला. ते म्हणाले की, “व्यवसाय करताना गैरप्रकार सर्वत्र होतात, पण अंबानी आणि अदानी यांच्यातला खरा फरक समजून घेतला पाहिजे.”
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर उदयाला येण्याआधीच अंबानी समूह देशातील एक प्रभावी औद्योगिक घराणे होते. मात्र, अदानी समूहाचा वेगाने झालेला विस्तार हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतरच झाल्याचा आरोप त्यांनी केला. “मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर अदानींना मुंद्रा बंदर मिळालं आणि पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना सातत्याने मोठे प्रकल्प मिळत गेले,” असे राज ठाकरे म्हणाले.
या मुलाखतीदरम्यान मुंबईतील जमिनी, संपत्ती आणि पायाभूत सुविधांबाबतही गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले. मुंबईतील संपत्ती हळूहळू एका विशिष्ट वर्गाच्या हाती जात असून, त्याचा लाभ महाराष्ट्राबाहेर नेला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाखाली सध्याच्या मुंबई विमानतळाची जमीन भविष्यात विक्रीस काढण्याचा डाव असल्याची भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
याशिवाय, “जर आज केंद्रात भाजपाऐवजी दुसऱ्या पक्षाचे सरकार असते आणि एखाद्या उद्योगपतीला अशा पद्धतीने मदत मिळाली असती, तर भाजपाची प्रतिक्रिया काय असती?” असा थेट सवाल करत त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, शिवराजसिंह चौहान आणि नितीन गडकरी यांसारख्या नेत्यांना बाजूला सारले जात आहे. “आज पक्षातील अनेक लोक गप्प आहेत, कारण त्यांच्याकडे निर्णयक्षमतेचा अभाव आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशावर जे घडत आहे, ते गेल्या अनेक दशकांत कधीच घडले नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी या मुलाखतीत दिला.

More Stories
शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षकाला घरात घुसून मारहाण; विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत केली कारवाईची मागणी…
आळेफाटा येथे पिकअप आणि बोलेरो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, नऊ जखमी
बारावी विज्ञान शाखेचा फिजिक्स-केमिस्ट्री पेपर फुटला; नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल