September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

राज–उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीवर आशिष शेलारांचा घणाघाती हल्ला; “मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर उतरले?”

मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या संयुक्त मुलाखतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुलाखतीनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी मुंबईतील पूरस्थितीचा मुद्दा उपस्थित करत सवाल केला की, “मुंबईकर संकटात असताना ठाकरे बंधू नेमके कुठे होते?” त्यांनी पुढे म्हणाले की, मुंबईकर पाण्यात अडकले असताना काहीजण बंगल्यात, तर काहीजण आलिशान हॉटेलमध्ये वास्तव्यास होते.

राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावत शेलार म्हणाले, “सिनेमा पाहणे, फाफडा-जिलेबी खाणे आणि मित्रांसोबत गप्पा मारणे हेच जर काम असेल, तर मुंबईकरांशी त्यांचा काय संबंध?” ठाकरे बंधूंना मुंबईच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, असा आरोपही त्यांनी केला.

महेश मांजरेकर यांच्या राजकारणातील भूमिकेवरही आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त करत, कलाकारांनी राजकारणात पडू नये, असे मत मांडले.

दरम्यान, अमित ठाकरे यांच्या माहीम विधानसभा निवडणुकीतील पराभवावरूनही आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले. “तुम्ही तुमच्या घरातील उमेदवारालाही विजयी करू शकला नाहीत. ज्या मतदारांनी त्यांना घरी बसवले, त्याच पक्षासोबत आज तुम्ही हातमिळवणी करत आहात,” असा टोला त्यांनी लगावला.

सत्तेत राहून जनतेसाठी काम करणाऱ्यांवर टीका करण्याआधी आत्मपरीक्षण करा, असा सल्लाही आशिष शेलार यांनी यावेळी दिला. ठाकरे बंधू मुंबईकरांसाठी प्रत्यक्ष कधी रस्त्यावर उतरले, हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आपली टीका अधिक तीव्र केली.

Spread the love

You may have missed